नव्या नियमाअंतर्गत आता सरेंडर व्हॅल्यूचं मोजमाप नव्या पद्धतीने केलं जाईल. जर तुम्ही 4 वर्षं प्रिमिअम भरला असेल आणि पॉलिसी सरेंडर केली तर आधी 4 लाखातील 2.4 लाख मिळत असत. आता मात्र 3.1 लाखापर्यंत रक्कम मिळेल.
एलआयसी आणि इतर विमा कंपन्यांच्या योजना मध्यातच सोडणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. IRDAI (भारतीय विमा नियामक प्राधिकरण) रडून सरेंडर व्हॅल्यू नियमांत मोठा बदल केला आहे. 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू नव्या नियमांअंतर्गत आता योजना धारकांना आधीच्या तुलनेत 20-30 टक्के जास्त रक्कम परत मिळेल.
सरेंडर व्हॅल्यू काय असते?
जेव्हा एखादी व्यक्ती आपली जीवन विमा योजना मॅच्यूरिटी होण्याआधी म्हणजे मुदतपूर्तीपूर्वी बंद करते, तेव्हा विमा कंपनी त्याला परत करत असलेली रक्कम म्हणजे सरेंडर व्हॅल्यू असते. ही रक्कम तुम्ही किती वर्षं प्रीमियम भरला आहे आणि तुम्ही कोणत्या प्रकारची योजना घेतली आहे यावर अवलंबून असते.
नव्या नियमात काय बदल झाले आहेत?
IRDAI सरेंडर व्हॅल्यूशी संबंधित नियमात महत्त्वाचे बदल केले आहेत. आता सर्व एंडोमेंट योजनांवर स्पेशल सरेंडर व्हॅल्यू (SSV) लागू होईल. याचा अर्थ, आता ग्राहकांना पॉलिसी सरेंडर केल्यानंतर जास्त रक्कम मिळेल. आधी दोन वर्षांपर्यंत सरेंडर केल्यास काही मिळत नसे, पण आता एक वर्षानंतरही आंशिक रक्कम परत केली जाईल.
किती पैसे मिळणार?
नव्या नियमांतर्गत सरेंडर व्हॅल्यूचं मोजमाप आता नव्या पद्धतीने केलं जाईल. जर तुम्ही 4 वर्षं प्रिमिअम भरला असेल आणि पॉलिसी सरेंडर केली तर आधी 4 लाखातील 2.4 लाख मिळत असत. आता मात्र 3.1 लाखापर्यंत रक्कम मिळेल. तसंच जर तुम्ही आधी एक वर्षं प्रिमिअम भरला असेल तर काही मिळत नसे. पण आता 1 लाखातील 62 हजार परत मिळू शकतात.
सरेंडर व्हॅल्यू कशी मोजली जाईल?
IRDAI ने सरेंडर व्हॅल्यू मोजण्यासाठी एक नवीन सूत्र ठरवले आहे. आता 10 वर्षांच्या सरकारी बाँडचा व्याजदर आधार म्हणून घेतला जाईल. विमा कंपन्या त्यात जास्तीत जास्त 0.50 टक्के भर घालू शकतात. ही नवीन पद्धत सिंगल प्रीमियम आणि 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या योजनांना देखील लागू असेल.
योजना सरेंडर कशी करायची?
जर तुम्हाला पॉलिसी सरेंडर करायची असेल तर सर्वात आधी एलआयसीच्या अधिकृत बेवसाईटवर जाऊन सरेंडर व्हॅल्यू कॅल्क्युलेटरचा वापर करा. यानंतर आपल्या जवळच्या शाखेत जाऊन फॉर्म 5074 जमा करा. जाताना सर्व केवायएसी आणि पॉलिसी कागदपत्रं सोबत घेऊन जा.
नवीन नियम कोणत्या पॉलिसींवर लागू होतील?
हे नवीन नियम फक्त 1 ऑक्टोबर 2024 नंतर जारी केलेल्या नवीन पॉलिसींना लागू होतील. पूर्वीचे नियम अजूनही जुन्या पॉलिसींना लागू असतील. त्यामुळे, जर तुमची पॉलिसी जुनी असेल तर तुम्हाला नवीन नियमांचा लाभ मिळणार नाही.
बदल करण्यामागील कारण काय?
IRDAI चा मुख्य उद्देश विमा ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणं आहे. पूर्वी अनेक ग्राहकांना पॉलिसी सरेंडर केल्यानंतर मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागायचा. नवीन नियमांमुळे पारदर्शकता वाढेल आणि ग्राहकांना योग्य माहिती मिळेल. आता, पॉलिसी खरेदी करताना, ग्राहकांना पॉलिसी मध्येच सोडल्यास त्यांना किती पैसे परत मिळतील हे सांगितले जाईल.
जर तुम्ही तुमची पॉलिसी सरेंडर करण्याचा विचार करत असाल, तर प्रथम तुमच्या LIC एजंटशी संपर्क साधा आणि नवीन नियमांबद्दल संपूर्ण माहिती मिळवा. शक्य असल्यास, पॉलिसी सरेंडर करण्याऐवजी, ती पेड-अप (मर्यादित पेमेंट) करण्याचा पर्याय निवडा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात काही फायदे मिळू शकतील.