टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Sanjay Raut : ज्याच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली, अखेर तो ही गेला; पैलवानाचा पक्ष प्रवेश बोचला, राऊतांनी अखेर बोलून दाखवली मनातील सल

Sanjay Raut : उद्धव ठाकरे गट हा एकटाच जणू राज्यात लढतोय अशी स्थिती दिसत आहे. विरोधी पक्षाची धुरा या एकाच पक्षावर असल्याचे चित्र आहे. त्यातच त्यांचे एक एक साथीदार महायुतीच्या गळाला लागत आहेत. त्यातच राऊतांनी मनातील ती सल बोलून दाखवली.

उद्धव ठाकरेंची शिवसेनाच सध्या सरकारविरोधात सक्रिय दिसत आहे. 2022 नंतर शिवसेनेवर सातत्याने प्रहार होत आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठे भगदाड पडल्यानंतर पक्षाला लागलेली गळती काही केल्या थांबताना दिसत नाही. महायुती त्यांच्या एका एका साथीदाराला त्यांच्या खेम्यात ओढत आहे. पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे गटाने जीवाचे रान केले होते. महाविकास आघाडीला अंगावर घेतले होते. पण हा पैलवानच विरोधी गोटात गेल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. त्याबाबत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी मनातील ती सल अखेर बोलून दाखवली.

सांगली लोकसभेसाठी टोकाची भूमिका

पैलवान चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाने शिवसेनेकडून लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरवले होते. त्यावरून महाविकास आघाडीत कमालीची धुसफूस उभ्या महाराष्ट्राने पाहिली होती. काँग्रेससोबत त ठाकरे गटाचे मतभेद टोकाला गेले होते. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं होते. त्यानंतर पाटील यांना शिंदे गोटात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

ज्याच्यासाठी प्रतिष्ठा पणाला…

चंद्रहार पाटील यांनी निवडणूक लढावी अशी इच्छा होती. त्या इच्छेसाठी आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली, अशी सल संजय राऊत यांनी व्यक्त केली. अशा माणसानं स्वार्थासाठी, लाभासाठी बेईमान व्हावं, हीच तर बेईमानी आहे. काय कमी केलं. ठीक आहे सत्ता आली नाही. तुमच्या गावात तुम्हाला मतं पडली नाहीत, असा घणाघात राऊतांनी चंद्रहार पाटील यांना घातला. ज्या माणसासाठी आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली, त्याने सुद्धा बेईमानी करावी. या बेईमानीचे वर्णन काय करावं असे ते म्हणाले.

तो कुणाच्या गळ्यातील चंद्रहार आहे, हा मुद्दा जाऊ द्या. अशी उपमा देऊ नका. त्याला विटासारख्या गावात 10 हजार मत पाडता आली नाही. अपक्ष लढणार होता. उमदा तरूण होता. त्याच्या क्षेत्रात त्याला काही तरी करायचं होतं, म्हणून आम्ही उमेदवारी दिली. तो जर अपक्ष लढला असता तर 5 हजार पण मतं नसती पडली. 60 हजार जी शिवसेनेची होती ती त्याला पडली. आर्थिक लाभापोटीच चंद्रहार पाटील शिंदे गोटात गेल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

एकनाथ शिंदे यांनी कधी कोणत्या काळी बाळासाहेबांचे विचार आत्मसात केले हे मला माहिती नाही. ते कोणत्या काळात बाळासाहेबांसोबत होते. त्यांनी बाळासाहेबांसोबत कधी काम केले ते पाहावे लागेल. महाराष्ट्र आणि मुंबईला धोका असताना ते भाजप, मोदी, शाहांचे लांगूलचालन करत असल्याचा आरोप राऊतांनी यावेळी केला.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा