शिंदेसेनेचे रविंद्र धंगेकर यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेमुळेच भाजप सत्तेत असल्याचा दावा करत भाजपला लक्ष्य केले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेविरोधात बोलणे थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली.

आज भारतीय जनता पक्ष (BJP) सत्तेमध्येआहे, ते एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळेच, असं म्हणत शिंदेसेनेच्या (Shivsena) रविंद्र धंगेकरांनी भाजपला डिवचलं आहे. भाजपाने शिवसेनेचे आभार मानावेत, असंही धंगेकरांनी सुनावलं आहे. त्यांच्या या पोस्टमुळे महायुतीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली असून सगळीकडे सध्या धंगेकर यांच्या ट्विटचीच चर्चा सुरू आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसनेविरुद्धची वक्तव्य थांबवावीत, असंही धंगेकर यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र या पोस्टमुळे महायुतीतील दोन महत्वाचे पक्ष असलेले भाजप- शिवसेना, यांच्यातील अंतर्गत मतभेद, धुसफूस समोर आल्याचे दिसत आहे. याच टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीने धंगेकरांशी संवाद साधल्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दुश्मनाला संपवण्याआधी मित्रालाच संपवण्याचा कारभार
एवढं मोठं धाडस करून, सर्वसामान्य भगिनींसाठी लाडकी बहीण योजना चालू केली. या योजनेमुळे अनेक आमदार निवडून आले, एकनाथ शिंदेंमुळे महाराष्ट्रात सत्ताच आली. त्यामुळे हे सगळे जे लोक ( सत्ते) बसलेत, ते सगळे एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच आहेत. त्याचं श्रेय शिंदे यांनाच जातं, असं धंगेकर म्हणाले. मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही मान्यवर चुकीच्या पद्धतीने चर्चा करत होते. दुश्मनाला संपवण्याआधी मित्राला संपवण्याचा कारभार काही मंडळी या ठिकाणी करत आहे. उदय सामंत यांच्याविरोधात जी गरळ ओकली, ती योग्य नाही. त्यांनी महिला भगिनी ही सोडल्या नाहीत बोलताना. अशी पद्धतीचं कुरघोडीचं राजकारण थांबवलं पाहिजे, टीका करताना भान बाळगलं पाहिजे, असं धंगेकर यांनी सुनावलं.
काय आहे धंगेकरांचं ट्विट ?
आज जी भाजप सत्तेत आहे ती सगळी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेची कृपा आहे.आज जर राज्यातील लोकप्रिय आमदारांची लिस्ट केली तर आदरणीय उदयजी सामंत साहेब व शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी राज्यात अव्वल आहेत.त्यामुळे भाजपने शिवसेनेचे आभार मानावे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेविरुद्धची वक्तव्ये थांबवावी, असं धंगेकरांनी म्हटलंय.
आमचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांच्याबाबत भाजपचे विजय चौधरी आणि अमरीश पटेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा मी जाहीर निषेध करतो. अशी आक्षेपार्ह विधाने आम्ही कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा धंगेकरांनी दिला.
याचं श्रेय एकनाथ शिंदेंना
लाडकी बहीण योजना ही तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्यात सुरू केली. या योजनेमुळे भाजपसह महायुतीचे सर्व आमदार निवडून आले. याचे श्रेय एकनाथ शिंदे साहेब यांना जाते, हे वारंवार आक्षेपार्ह विधान करणाऱ्या वाचाळ भाजपच्या नेत्यांनी ध्यानात घ्यावे, असंही त्यांनी नमूद केलं.
राज्याच्या विकासासाठी, उद्योग वाढीसाठी सतत झटणारा नेता अशी मा. उदय सामंत साहेब यांची जनमाणसात प्रतिमा आहे. त्यांनी कायमच जनतेच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले आहे. अशा नेत्यांवर आक्षेपार्ह विधान करून स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचा हा चौधरी आणि पटेल यांचा केविलवाना प्रयत्न दिसतो आहे.













