# वेळापुरात शिवसेनेची भव्य सभा; ‘एसआयआर’ मतदार याद्या पुनरीक्षणाचा आणि बूथ रचनेचा जोरदार आढावा
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून सांगोला आणि माळशिरस मतदारसंघातील बूथ रचनेचा गौरव

*वेळापूर (ता. माळशिरस): दिनांक २७ मे रोजी वेळापूर येथे शिवसेना पक्षाच्या ‘BLA-2’ (बूथ लेव्हल एजंट) अभियानाचा आणि प्रमुख पदाधिकारी निवडीचा भव्य मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. सध्या राज्यात सुरू असलेल्या “एसआयआर” (SIR) मतदान पुनरीक्षण याद्यांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत सांगोला विधानसभा मतदारसंघातील ३०५ बूथ आणि माळशिरस मतदारसंघातील सर्व बूथ रचनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या ऐतिहासिक सभेला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत साहेब, शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुलजी शेवाळे साहेब, सोलापूर जिल्ह्याच्या खासदार ज्योतीताई वाघमारे, सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील साहेब आणि माढा लोकसभा संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सांगोल्याच्या बूथ रचनेचे उदय सामंतांकडून कौतुक
सभेला मार्गदर्शन करताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगोला तालुक्यातील बूथ रचनेचे विशेष अभिनंदन केले. ते म्हणाले, “तालुक्यात ३०५ BLA ची नेमणूक करणे आवश्यक असताना, सांगोल्यामध्ये तब्बल ६१० लोकांची नियुक्ती करून ऑनलाईन पद्धतीने मतदार याद्यांचे पुनरीक्षण सुरू आहे, हे कौतुकास्पद आहे. तालुक्यातील स्थानिक निवडणुकांमध्ये (नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती) मिळालेल्या मतांच्या बेरजेनुसार सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे पारडे अत्यंत जड आहे.”
पुढे बोलताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की, “भविष्यातील राजकारणात २०२९ ला सांगोल्याचे आमदार पुन्हा शहाजीबापू पाटील साहेबच होतील.” तसेच, “माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जो उठाव झाला, त्याचे मुख्य शिलेदार शहाजीबापू पाटील आहेत. त्यांच्यामुळेच गुवाहाटीचे पर्यटन आणि शिवसेनेची प्रसिद्धी देशभरात झाली,” अशी जाहीर कबुलीही सामंत यांनी यावेळी दिली. कडक उन्हाळ्यात ४२°C तापमान असतानाही शिवसैनिकांनी दाखवलेल्या ताकदीबद्दल आणि पक्षावरील प्रेमाबद्दल त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाची सुरुवात शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे यांनी सर्वांचे स्वागत करून केली. माळशिरस तालुक्याच्या वतीने सभापती पैलवान दत्ता मगर आणि सागर पाटील यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचा व मान्यवरांचा भव्य सत्कार केला.

या भव्य मेळाव्यासाठी सांगोला नगरपालिकेचे नगराध्यक्ष आनंदभाऊ माने, गटनेते पप्पू धनवजीर, सर्व समितीचे सभापती व नगरसेवक, उपसभापती अजय सरगर, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब बंडगर, पंचायत समिती सदस्य उमेश पाटील, युवक नेते गुंडादादा खटकाळे, योगेश खटकाळे, धनंजय काळे, उदयसिंह घाडगे, अमित पाटील, चंद्रकांत चौगुले, महेंद्रकुमार बाजारे, विजय मगर, तानाजी भोसले, तसेच प्रसिद्धीप्रमुख दीपक ऐवळे प्रामुख्याने उपस्थित होते.
याशिवाय सांगोला व माळशिरस तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, बूथ लेव्हलवर काम करणारे सर्व ‘बीएलए’ (BLA), महिला भगिनी, पत्रकार आणि हजारो शिवसैनिक या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कडक उन्हाची तमा न बाळगता कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या या उत्साहामुळे परिसरात शिवसेनेने मोठे शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले.
६ हजार कोटींचा निधी आणूनही पराभवाची खंत, पण आता गाफील राहणार नाही: शहाजीबापू पाटील
यावेळी बोलताना माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “सांगोला तालुक्यासाठी ६ हजार कोटींपेक्षा जास्त निधी आणला, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना मंजूर करून घेतली, तरीही केवळ मतदार याद्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आणि बूथ लेव्हलवर काम कमी पडल्यामुळे गेल्या वेळी पराभव स्वीकारावा लागला.” ही खंत व्यक्त करतानाच, “आता भविष्यात ‘एसआयआर’ मतदान पुनरीक्षण याद्यांमध्ये योग्य नावे टिकवणे आणि बोगस नावे वगळणे ही काळाची गरज असून, आगामी काळात गाफील न राहता काम करावे,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.













