एकीकडे इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धसमाप्तीसाठी चर्चा सुरू आहे. असे असतानाच आता इराणने थेट मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे भारतालाही काही प्रमाणात फायदा होणार आहे.

इराणने केली मोठी घोषणा
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीविषयी माहिती दिली आहे. त्यांनी 25 मे रोजी एक पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील व्यवस्थापनाबाबत माहिती दिली आहे. या सामुद्रधुनीचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार हा किनारपट्टीवरील देशांकडे आहे. इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीवर टोल वसूल करणार नाही. परंतु या सामुद्रधुनीत ज्या सेवा दिल्या जातील, त्या बदल्यात आम्ही सेवाशुल्क घेऊ असे बाघेई यांनी सांगितले.

याआधी इराणने एक प्राधिकरण स्थापन करून व्यापारी जहाजांकडून टोल वसूल केला जाईल, अशी घोषणा केली होती. परंतु आता हा टोल आम्ही वसूल करणार नाही,असे बाघेई यांनी सांगितले आहे. आम्ही देत असलेल्या सेवांच्या बदल्यात काही शुल्क आकारले जाईल. हा टोल नसेल. या शुल्काला टोल म्हणणे चुकीचे आहे. इराम आणि ओमान यावेळी एक नवा मसुदा तयार करत आहोत. या कराराअंतर्गत होर्मुझची सामुद्रधुनी, ओमाचे आखात, पर्शियन आखात या भागातील पर्यावरणाची सुरक्षा करण्यासाठी वेगवेगळ्या सेवा दिल्या जातील. त्यासाठी पर्यावरण कर वसूल करणे गरजेचे आहे. याबाबत आम्ही ओमानसोबत लवकरच एक करार करू, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आता इराणने आम्ही टोल वसूल करणार नाही, असे सांगितल्याने व्यापारी जहाजांना फायदा होणार आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.











