Navatapa: ‘नवतपा’च्या काळात महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा चढाच राहणार आहे.

What is Navatapa: गेल्या 15 दिवसांपासून राज्यघरातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला असताना आजपासून (25 मे 2026) पासून ‘नवतपा ‘ (Navatapa) सुरू होणार आहे. नवतपा म्हणजे उन्हाळ्यातील सर्वात उष्ण 9 दिवस. हे नऊ दिवस सूर्य पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. त्यामुळे तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्ण वाऱ्यांनी टोक गाठलेलं असतं. नवतपा आजपासून म्हणजेच 25 मे ते 2 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर व पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानाचा पारा 48 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो. 28 ते 30 मे दरम्यान या भागांमध्ये तीव्र वादळाचाही इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्रामध्ये विदर्भात 25 ते 30 मे पर्यंत उष्णतेच्या लाटा कायम राहणार आहेत. ‘नवतपा’च्या काळात महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा चढाच राहणार आहे. ( What is Navatapa)
नवतपा का पडतो? (Why Navatapa Occur)
हिंदू पंचांगानुसार रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो त्यावेळी नवतपा सुरू होतो. या काळात तापमानाचा पारा 45 ते 52 अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकतो. विज्ञानानुसार या काळात सूर्य कर्क रेषेजवळ आलेला असतो. परिणामी सूर्यकिरणे थेट पृथ्वीवर पडतात आणि प्रचंड उष्णता वाढते.दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूनच्या सुरुवातीला हा काळ नागरिकांना सोसावा लागतो. या दिवसात दुपारच्या वेळी प्रचंड उकाडा, उष्ण वारे आणि अंगाची लाही लाही करणारे ऊन यामुळे नागरिक हैराण होतात. तब्बल 9 दिवस ही परिस्थिती कायम राहते. त्यामुळे याला नवतपा म्हटले जाते.

नवतपाचा शरीरावर काय परिणाम ? (Effects Of Navatapa)
या वाढत्या उन्हामुळे हिट स्ट्रोक, अशक्तपणा, चक्कर येणे आणि डिहायड्रेशनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने थकवा डोकेदुखी आणि बेचैनी जाणवू शकते. या काळात लहान मुलं वृद्ध व्यक्ती आणि बाहेर काम करणाऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास जाणवू शकतो.
नवतपापासून बचाव कसा कराल ? (How To Protect Yourself from Navatapa)
नवतपाच्या दिवसात दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणं टाळावं.बाहेर जाताना डोक्यावर टोपी स्कार्स किंवा छत्रीचा वापर करावा. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून भरपूर पाणी, ORS, , ताक, लिंबू पाणी आणि इतर द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवा. हलका आणि पचायला सोपा आहार घ्या. जास्त वेळ उन्हात काम करणं टाळल्यास उष्माघातापासून वाचणे सोपे जाईल.

नवतपा संपल्यानंतर काय ? (What After Navatapa)
नवतपा संपल्यानंतर हवामान बदलास सुरुवात होते. या 9 दिवसानंतर मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होतं.आणि उष्णतेपासून दिलासा मिळतो.
विदर्भ तापला, कुठे रेड -ऑरेंज अलर्ट?
गेल्या दोन आठवड्यांपासून विदर्भात सलग उष्णतेच्या लाटांचे इशारे देण्यात येत आहेत. रविवारी विदर्भात ब्रह्मपुरी येथे 47.2 अंश सेल्सिअस एवढे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर, गडचिरोली,अमरावती, नागपूर, अकोला, गोंदिया, भंडारा या सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 44 – 45 अंश सेल्सिअस एवढा होता.पुढील चार दिवस विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमानाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत. सोमवारी (25 मे ) अमरावती वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यांना तापमानाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. अकोला, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत . यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 48 तासात आठ जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू उष्माघाताचे बळी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.त्यामुळे नवतपाच्या काळात विदर्भातील तापमान आणखी वाढण्याची भीती नागरिकांना वाटतेय.











