रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात मध्यरात्री भीषण अपघात घडला. 8 सातारकर तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांची स्कॉर्पिओ 1000 फूट खोल दरीत कोसळली. दोन दिवस हर्णे बीचवर एन्जॉय करून परतताना चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूरच्या आंबेनळी घाटात पहाटे 2:45 वाजता झालेल्या भीषण अपघातात 8 तरुणांचा मृत्यू झाला आहे. महाबळेश्वर आणि पोलादपूर दरम्यानच्या आंबेनळी घाटात हा भीषण अपघात झाला. स्कॉर्पिओ 1000 फूट खोल दरीत कोसळून 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या आठही तरुण साताऱ्याचे होते. साताऱ्याला जात असताना त्यांच्यावर काळाचा घाला झाला. त्यामुळे साताऱ्यावर शोककळा पसरली आहे.

हा अपघात अत्यंत भयंकर होता. 1000 फूट खोल दरीतून मृतदेह काढणं कठिण होतं. त्यात अंधार असल्याने रेस्क्यू ऑपरेशन करणं कठिण झालं होतं. पोलिसांनी चार पथकांच्या सहाय्याने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. प्रतापगड ट्रेकर्स, महाबळेश्वर ट्रेकर्स, रोह्याचं सह्याद्री रेस्क्यू फाऊंडेशन आणि महाडचं रेस्कू फाऊंडेशन अशा चार रेस्क्यू फाऊंडेशनच्या माध्यमातून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी आतापर्यंत दोन डेडबॉडी ताब्यात घेतल्या आहेत. दोन्ही मृतदेह कोल्हापूरला सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. इतर सहा तरुणांचे मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. रात्रीचा अंधार असल्याने आणि खोल दरी असल्याने रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळा येत आहे.

हे आठही तरुण साताऱ्याचे आहेत. शुक्रवारी रत्नागिरीला आले होते. हर्णे बीचवर दोन दिवस एन्जॉय केल्यानंतर काल संध्याकाळी 5-6 वाजेच्या दरम्यान ते साताऱ्याला जायला निघाले. त्यावेळी त्यांचा अपघात झाला. त्यात आठही जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईंकाच्या मते, शुक्रवारी रात्री ही मुलं रत्नागिरीला हर्णे बीचवर आली होती. शनिवारी त्यांनी हर्णे बीचवर मुक्काम केला. त्यानंतर रविवारी पहाटे अडीच वाजता हर्णे बीचवरून जात होते. सर्वजण थकले होते. कुणीही विश्रांती घेतलेली नव्हती. त्यामुळे चालकाला झोप जास्त झाली असेल. विश्रांती नसल्याने चालकाला डुलकी लागली असावी आणि त्यांची कार दरीत गेली असावी.











