भारताने पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळांना उद्धवस्त करण्यात आले आहे. भारताकडून करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. आता यावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. आता अखेर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत पाकड्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानातील ९ ठिकाणी एअर स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळांना उद्धवस्त करण्यात आले आहे. भारताकडून करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. आता यावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
नुकतंच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ट्वीट करत भारतीय सैन्य दलाचे कौतुक केले आहे. “आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन! जय हिंद!”, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
संजय राऊत, राहुल गांधींची प्रतिक्रिया काय?
तसेच संजय राऊत यांनी यावर दोन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. जय हिंद! असे संजय राऊतांनी म्हटले आहे. त्यासोबतच राहुल गांधी यांनीही ट्वीट करत याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. मला आपल्या सैन्य दलाचा अभिमान आहे. जय हिंद; असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
अजित पवार काय म्हणाले?
भारताने दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून नष्ट केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय सैन्यदलांचे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचे अभिनंदन केले आहे. भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश एकजुटीने त्यांच्यामागे उभा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कारवाईचे समर्थन, कौतुक केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद आता सहन केला जाणार नाही, हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने पुन्हा सिद्ध केले आहे. पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. या हल्ल्याने संपूर्ण देश संतप्त होता. या हल्ल्याची जबाबदारी लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी घेतली होती. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने आज भल्या पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून नियोजनबद्ध, अचूक हल्ले करत दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. या कारवाईत नऊ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आल्याची माहिती आहे. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीने कारवाई होत राहील, हा संदेश देण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय वायुसेना, नौसेना आणि थलसेनेच्या नेतृत्वाचे आणि सैनिकांचे अभिनंदन केले आहे.
देशाच्या सीमेपलिकडे जावून लष्करी कारवाई करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची असते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या साहसी, कणखर नेतृत्वानं ती नेहमीच इच्छाशक्ती दाखवली आहे. भारतीय सैन्यदलांना संपूर्ण स्वातंत्र्य, मोकळीक, ताकद देत त्यांच्यामागे भक्कमपणे उभं राहिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. सैन्यदलांची ताकद, राजकीय इच्छाशक्ती, देशवासियांच्या एकजुटीतून ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्याचे सांगत दहशतवाद संपेपर्यंत अशीच कारवाई होत राहील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.