महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या चित्रपटाविषयी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिल आहे. त्याचप्रमाणे हा चित्रपट जरुर पहा, असं आवाहनंही त्यांनी केलं आहे.
महाराष्ट्राची प्रेरणा आणि अस्मितेचा मानबिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळात अवतरतात आणि इथल्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची दखल घेण्यासाठी लढतात अशी रोचक कल्पना असलेला ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या चित्रपटाविषयी खास पोस्ट लिहिली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मांजरेकरांचा हा चित्रपट पाहिला आणि आता त्यावर त्यांनी आपले विचार मांडले आहेत. खरा समकालीन, किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाला पर्याय नाही, असं त्यांनी म्हटलंय. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके मुख्य भूमिकेत असून त्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
‘आज फक्त मोठे मोठे महामार्ग, पूल (ज्यावर काही महिन्यात खड्डे पडतात ) आणि चमकदार घोषणा म्हणजे ‘विकास’ अशी कल्पना सत्ताधाऱ्यांनी रुजवली आहे. यांत बाकी कोणाचा विकास होतो की नाही माहित नाही पण सत्ताधाऱ्यांचा विकास नक्की होतो. हे केलं आणि धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की मग शेतकरी असो की इथला मराठी माणूस यांना हवं तसं वापरून फेकून द्यायला हे मोकळे,’ असं त्यांनी लिहिलंय.
महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीबाबतत त्यांनी पुढे म्हटलंय, ‘या राज्यातील शेतकरी तर पार हतबल आहे. एका बाजूला पाऊस झोडपतो आणि दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा अनास्थेने झोडपते.. याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्याच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो हे भीषण दुर्दैव आहे. एका बाजूला ग्रामीण भागात शेतकऱ्याला इतकं जेरीस आणायचं की त्याला जमीन विकावीच लागेल आणि दुसरीकडे शहरात मराठी माणसांनाच घरं नाकारायची, त्यांच्या भाषेचा अपमान करणाऱ्यांना अभय द्यायचं, त्यांनी काय खायचं ? काय नाही खायचं यावर बंधन आणणऱ्यांचे लाड करायचे हे सुरु आहे.’
या पोस्टच्या अखेरीस त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला विशेष आवाहन केलं आहे. ‘हे सगळं मराठी माणसाला दिसत नाहीये का ? दिसत असेल ही… पण जोपर्यंत तुमच्या मनात याविरोधात चीड निर्माण होणार नाही, आग निर्माण होणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणं सोडा अजून भीषण होईल. या सिनेमातून ही चीड महेश मांजरेकर, त्यांचे कलाकार आणि त्यांचे लेखक यांनी उत्तम मांडली आहे. हा फक्त चित्रपट नाही तर या टीमच्या मनातील अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता महाराष्ट्रातील जनतेने अनुभवयाला हवी. त्यासाठी माझं तुम्हाला आवाहन आहे की ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट जरूर पहा,’ असं त्यांनी लिहिलंय.
संबंधित बातम्या
या चित्रपटात विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने ,नित्यश्री आणि सयाजी शिंदे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.





