अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार असून, या अपघातामागील तांत्रिक शंका आणि महत्त्वाचे खुलासे करण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला बारामतीत दुर्दैवी विमान अपघात झाला. या अपघाताने संपूर्ण राज्य हादरले होते. आता या प्रकरणाला एक नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. या अपघाताबाबत सर्वसामान्यांसह पवार कुटुंबाच्या मनातही अनेक शंका असल्याचे चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता आमदार रोहित पवार हे आज पत्रकार परिषद घेणार आहे. आज मंगळवार १० फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता मुंबईत महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार आहे, अशी माहिती रोहित पवारांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार या पत्रकार परिषदेत विमान अपघाताचा तांत्रिक घटनाक्रम, हवामानाचा अहवाल आणि विमान उड्डाणापूर्वीचे काही संशयास्पद तपशीलबद्दल भाष्य करण्याची शक्यता वर्तवली आहे.

नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ८.४५ च्या सुमारास त्यांचे खाजगी विमान बारामती विमानतळावर उतरत असताना तांत्रिक बिघाडामुळे जमिनीवर कोसळले आणि क्षणात विमानाने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील अन्य सहकाऱ्यांचाही जागीच अंत झाला. या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. राजकारणातील एका पॉवरफुल पर्वाचा असा अनपेक्षित अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या अपघाताच्या वेळी हवामान स्पष्ट असतानाही विमान नेमके कसे कोसळले, याबाबत आता विविध तांत्रिक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी यापूर्वीच विमानात स्फोट झाल्याचा किंवा बॉम्ब ठेवल्याचा संशय व्यक्त केला होता. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का? याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. यावर रोहित पवार यांनी विलिनीकरणाबाबत दादांची नेमकी काय इच्छा होती, हे ते १२ फेब्रुवारीला स्पष्ट करणार आहेत, असे म्हटले होते.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
रोहित पवारांच्या या पत्रकार परिषदेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजितदादांच्या अपघातामागे काही राजकीय षडयंत्र होते की केवळ तांत्रिक चूक, यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे.






