Parth Pawar VSR Aviation: 28 जानेवारी 2026 रोजी अजितदादा पवार यांचा बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात मृत्यू झाला. विमान हे VSR कंपनीचे होते. या कंपनीविरोधात आमदार रोहित पवार यांचा लढा सुरू असतानाच आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

Parth Pawar VSR Aviation: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात मृत्यू झाला. VSR कंपनीचे विमान 28 जानेवारी 2026 रोजी कोसळले. त्यानंतर या कंपनीविरोधात काहूर उठले. आमदार रोहित पवार यांनी या कंपनीच्या कारभाराचे वाभाडे काढले. अनेक व्हिडिओ समोर आले. त्यांनी विमान अपघात नसून घातपात असल्याचा आरोप केला. त्याची चार पत्रकार परिषद घेत याप्रकरणी अनेक धक्कादायक गोष्टी समोर आणल्या. तर विमान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी ते आक्रमक झाले. हे सर्व प्रकार घडत असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि दादांचे चिरंजीव खासदार पार्थ पवार यांनी VSR कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याचे समोर आले आहे. आता या मुद्दावर पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी याविषयीचे ट्वीट केले आहे.

का केला व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास?
VSR कंपनीच्या विमानातून खासदार पार्थ पवार यांनी प्रवास केला. त्यावरून काहूर उठल्यानंतर आता त्यांनी या विमानातून प्रवास का केला याविषयी ट्वीटमधून माहिती दिली आहे. “मोदी बाग, पुणे येथे पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचे असल्याने मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR Aviation चे विमान माझ्यासाठी बुक करण्यात आले. विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानापर्यंत जाईपर्यंत हे विमान VSR Aviation चे असल्याची मला कोणतीही कल्पना नव्हती.” असे स्पष्टीकरण खासदार पार्थ पवार यांनी दिले आहे.
विमान बुक करणाऱ्या एजंटशी केलेला करार रद्द
ही केवळ प्रशासकीय पातळीवरील चूक होती. याची मी गंभीर दखल घेतली असून संबंधित विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तत्काळ रद्द करत आहोत. तसेच माझ्या कर्मचारीवर्गाला आणि सहकाऱ्यांना अशा प्रकारच्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी अधिक सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.VSR Aviation बाबत यापूर्वीची आमची भूमिका आजही कायम आहे. आमचा स्पष्ट विरोध आहे आणि पुढेही तशीच राहणार आहे. यावरून निर्माण केला जाणारा वाद पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणारा आणि दुर्दैवी आहे. सत्य परिस्थिती समजून न घेता यावर राजकारण करण्याचा प्रयत्न योग्य नाही, अशी प्रतिक्रिया खासदार पार्थ पवार यांनी दिली.













