Accident News: ट्रॅव्हल्स चालक संतोष केशवराव शिंदे (वय ४९, रा. संभाजीनगर) हेही गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगराला हलवण्यात आलं आहे.
परभणी : परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा जवळील गणेशपूर शिवारात रविवारी सायंकाळी भीषण अपघातात झाला असून या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत अन्य चौघे जखमी झाले आहेत. स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच १२ जीएफ ६२५९) हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथून मंठा दिशेने जात होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स (क्र. एमएच २० डीडी ७६६६) ने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार रस्त्यापासून सुमारे ५० ते ६० फूट फेकली गेली. अपघातात कारचा अक्षरशः चक्कचूर झाला आहे. कारमधून सय्यद अजहर सय्यद महमूद हे आपल्या कुटुंबीयांसह मंठा येथील आपल्या बहिणीला भेटण्यासाठी निघाले होते, पण बहीण भावाची भेट या अपघाताने होऊ शकली नाही.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, सय्यद इस्माईल सय्यद महमूद हे हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील रहिवासी आहेत. रमजान ईदचा सण साजरा केल्यानंतर रविवारची सुट्टी आल्याने सय्यद अजहर हे आपल्या कुटुंबीयांसह मंठा येथील आपल्या बहिणीला भेटण्यासाठी कारणे निघाले होते. काल रविवार दिनांक 22 मार्च रोजी दुपारी दोनच्या दरम्यान हे कुटुंबीय आपल्या कापल्या कारने चारठाणा मंठा महामार्गाहून जात होते. चार ठाण्याजवळ गणेशपूर परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर येथून प्रवासी घेऊन येणाऱ्या मिनी ट्रॅव्हल्स बसची व सय्यद कुटुंबीयांच्या कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. या अपघातात सय्यद अबिदा महबूब, सय्यद सुमया अबिदा, सय्यद अबिद या तिघांचा जागेच मृत्यू झाला तर त्यांचा भाऊ सय्यद इस्माईल सय्यद महबूब हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. तसेच सय्यद साहिधा अबिद सय्यद जोहेरा अंजुम आबिद व सय्यद मिरज हे गंभीर जखमी झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगरहून येणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये एकूण १३ प्रवासी होते. त्यापैकी ४ ते ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर मंठा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. वाहनांचे पत्रे कापून जखमींना बाहेर काढण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून वेगमर्यादा आणि सुरक्षित वाहनचालन याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.










