Ladki Bahin Yojana: …तर घरी बसावं लागेल; देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या आमदाराला सर्वांसमोरच फटकारलं, अभिमन्यू पवारांना का सुनावलं?

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Devendra fadnavis News: हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चर्चेत आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना प्रत्येक विषयात या योजनेचा उल्लेख टाळण्याचा सल्ला दिला. तसंच आपल्या निकटवर्तीय आमदाराला सुनावलं आहे.

नागपूर: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चांगलाच गाजला. महिला अत्याचाराविषयी बोलताना महाविकास आघाडीच्या आमदारांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फटकारलं. त्यानंतर सत्ताधारी भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असलेले अभिमन्यू पवार यांनीही अवैध दारूविक्रीविषयी बोलताना लाडक्या बहि‍णींचा उल्लेख केल्याने मुख्यमंत्र्यांचा पारा चढला आणि त्यांनी आमदार पवार यांना सुनावल्याचं पाहायला मिळालं.

“आपण लाडक्या बहिणी, लाडक्या बहिणी म्हणतो पण अवैधरित्या होणारी दारूविक्री हे लाडक्या बहि‍णींचं सगळ्यात मोठं दु:ख आहे. त्यामुळे सरकारला याबाबत काम करावं लागेल. अध्यक्ष महोदय, तुम्ही स्वत: बैठक घेतली. त्यानंतर सूचना देऊनही हे बंद होत नाही. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे,” असं अभिमन्यू पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येक विषयात लाडकी बहीण आणू नका. लाडक्या बहि‍णींच्या विरोधात जाऊ नका, नाही तर घरी बसावं लागेल, अशा इशारा त्यांनी दिला.

विरोधकांचाही समाचार

काही आमदारांनी महिला सुरक्षेबाबत लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्व विषय लाडक्या बहिणीशी जोडणे चुकीचे आहे. अडीच कोटी लाडक्या बहिणींनी योजना स्वीकारली आहे. या योजनेसह महिलांच्या सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. निराधार योजनेचे कोणाचेही पैसे रोखले नाही. ज्यांचे केवायसी झाले नाही, केवायसी झाल्यानंतर थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा होईल, असंही त्यांनी सांगितलं. शक्ती कायद्यातील काही गोष्टी नवीन तीन कायद्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. कुठलीही समस्या मांडताना आमदार लाडकी बहिणीचा मुद्दे उपस्थित करतात. प्रत्येक गोष्टीत हा मुद्दा उपस्थित करणे योग्य नाही. ही योजना बंद होणार नाही, सुरूच राहील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

सातारा प्रकरणावर काय म्हणाले मुख्यमंत्री?

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील शासकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरने केलेली आत्महत्या प्रकरणात 60 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात येईल. या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचे प्रयत्न करू नका, पारदर्शक पद्दतीने चौकशी झाली आहे. कोणालाही सोडण्याचं कारण नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील शासकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरने केलेली आत्महत्येचा मुद्दा आमदार अमित साटम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. तपासात अडचणी येत असल्याचे मुद्देही आमदारांनी उपस्थित केले.

‘चौकशी समिती नेमली आहे. महिला अधिकारी याचा तपास करीत आहे. व्हॉट्सअॅप चॅट प्राप्त झाले आहे. महिला डॉक्टर हॉटेलमध्ये आल्या, याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज आहेत. नवीन कायद्याप्रमाणे फॉरेन्सिक पुरावे गोळा केले आहेत. 60 दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाईल. तेही आता अंतिम टप्प्यात आहे. याव्यतिरिक्त कोणी यात सहभागी आहे का, हे तपासण्यासाठी न्यायालयीन चौकशी सुरू आहे. कंत्राटी पद्धतीने या महिला डॉक्टर काम करत होत्या. त्यांच्या कुटुंबाला जी मदत करता येईल ती केली जाईल. यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. काही लोकांनी या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचे प्रयत्न झाले. हे चुकीचे आहे. पारदर्शक पद्दतीने चौकशी झाली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon