जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही निगरानी वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानच्या झेंडे रस्त्यावर चिकटवून निषेध दर्शविण्याचे प्रकार घडले आहेत. भारताने पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर पाठवण्याची कारवाई सुरू केली आहे.
गेल्या आठवड्यात मंगळवारी ( 22 एप्रिल) दुपारी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे फिरायला गेलेल्या पर्यटकांवर काही दहशतवाद्यांनी गोळीबार करत क्रूर हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांनी जाव गमावला तर अनेक जखमी झाले. दहशतावाद्यांच्या या नृशंस कृतीमुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण असून जगभरातूनही या हल्ल्याचा निषेध होतोय. हल्ल्यानंतर भारताने कडक पावल उचलत कठोर भूमिका घेतली. भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्याची प्रक्रियाही सुरू झाली असून पाकिस्तानातील भारतीयांना 1 में पर्यंत मायदेशी परतण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात हाय अलर्ट असून ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस वर गावी जाणाऱ्या प्रवाशांची तोबा गर्दी झालीये, त्या अनुशंगाने सुरक्षा वाढवण्यात आली असून विषेश व्यवस्था करण्यात आली आहे.
सीएसएमटी स्थानकावर सुरक्षा यंत्रणा अलर्ट
तसेच मुंबईतील दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या आणि देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीसही सतर्क झाले आहेत. मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्थानकांमध्ये आणि परिसरात सुमारे 10 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रभावी देखरेख ठेवली जात आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण 139 रेल्वे स्थानके आहेत, जिथून दररोज सुमारे 3,200 लोकल गाड्यांची वाहतूक होते. यामुळे दररोज सुमारे 75 ते 80 लाख प्रवासी प्रवास करतात. याशिवाय, शेकडो लांब पल्ल्याच्या गाड्याही चालवल्या जातात, ज्यामध्ये लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रणालीद्वारे सतत निरीक्षण केले जात आहे. सीएसएमटी आणि पुणे स्थानकांवर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत, आरपीएफ, जीआरपीएफ, डॉग स्क्वॉड कडून गस्तीला सुरूवात झाली आहे.
पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, बांद्रा टर्मिनस, बोरिवली आणि मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण या प्रमुख स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या थांब्यामुळे विशेष सुरक्षा उपाययोजना राबवण्यात येत आहेत. सगळीकडे अलर्ट जारी करण्यात आला असून पोलीसही डोळ्यांत तेल घालून सुरक्षेवर लक्ष ठेवत आहेत.
पुण्यात रस्त्यावर पाकिस्तानचे झेंडे चिकटवले
दरम्यान पहलगामच्या हल्ल्यानंतर पुण्यातील लक्ष्मी रोडवर रस्त्यावर पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर चिकटवत निषेध करण्यात आला आहे. या बाबतचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. पाकिस्तानच्या झेंड्याचे फोटो रस्त्यावर लावले असून त्यावरून अनेक वाहने जात आहेत, निषेध नोंदवला जात आहे.