Team India Semi Final Scenario Marathi News : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सध्या सुपर-8 फेरीतील सामने रंगतदार टप्प्यावर पोहोचले आहेत.
India vs West Indies T20 World Cup Super 8 : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सध्या सुपर-8 फेरीतील सामने रंगतदार टप्प्यावर पोहोचले आहेत. 26 फेब्रुवारी रोजी दोन सामने खेळल्या जाणार आहेत. काल भारत आणि झिम्बाब्वे आमनेसामने आले होते. या लढतीत टीम इंडियाने 72 धावांनी दणदणीत विजय मिळवत सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवल्या. आता भारतासमोर स्पष्ट समीकरण आहे, सेमीफायनलमध्ये पोहोचायचे असेल, तर शेवटचा सामना जिंकावाच लागेल.
सुपर-8 मधील अखेरचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध
भारत सुपर-8 टप्प्यातील आपला अखेरचा सामना 1 मार्च रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे वेस्ट इंडिज विरुद्ध खेळणार आहे. हा सामना ‘व्हर्च्युअल क्वार्टर फायनल’सारखाच मानला जात आहे. जो संघ जिंकेल, तो थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल.

पाऊस पडला तर काय?, जाणून घ्या ICC नियम (If India vs West Indies Match is Cancelled ICC Rules)
चाहत्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल. आयसीससीच्या नियमांनुसार सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. अशा परिस्थितीत भारत आणि वेस्ट इंडिज या दोघांच्या खात्यात प्रत्येकी तीन गुण होतील. मात्र, नेट रनरेटचा निकष निर्णायक ठरेल. सध्या वेस्ट इंडिजचा नेट रनरेट +1.791 आहे, तर भारताचा नेट रनरेट -0.100 आहे. त्यामुळे सामना रद्द झाल्यास वेस्ट इंडिज सेमीफायनलमध्ये पोहोचेल आणि भारताचा प्रवास इथेच थांबेल. म्हणजेच टीम इंडियाकडे आता एकच मार्ग उरला आहे तो म्हणजे विजय. फक्त आणि फक्त सामना जिंकूनच भारत सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करू शकतो.
भारताची आतापर्यंतची कामगिरी
या स्पर्धेत भारताने एकूणच दमदार कामगिरी केली आहे. सुपर-8 मधील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र, त्याआधी गट फेरीतील सर्व चार सामने भारताने जिंकले होते. अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध 72 धावांचा शानदार विजय मिळवत भारतीय संघाने पुनरागमन केले आणि सेमीफायनलची लढत अधिक रंगतदार केली आहे. आता 1 मार्चला कोलकात्यातील ऐतिहासिक मैदानावर होणाऱ्या निर्णायक सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतासाठी हा सामना ‘करो या मरो’ असा असणार आहे.










