Gokul Election: गोकुळ निवडणुकीवरून कोल्हापुरात महायुतीमध्ये वादाची ठिणगी सुरुच आहे. भाजप पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या आरोपांमुळे मुश्रीफ समर्थक देखील आक्रमक पवित्र्यात आहेत.

Gokul Election: भाजप समर्थक अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गोकुळमधील राजकारणांवरून आरोपांची राळ उडवली आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद टोकाला गेला आहे. गोकुळ निवडणुकीसाठी भाजप वगळून मित्र पक्षाच्या पॅनलसाठी मुख्यमंत्र्यांकडून परवानगी घ्या, अशी थेट मागणी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते भैया माने यांनी केली आहे. यानंतर भाजपने सुद्धा पलटवार केला. भाजप आणि शिवसेना सोडून राष्ट्रवादीचा आणखी कोणी छुपा मित्र आहे का? अशी विचारणा भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केली आहे. त्यामुळे गोकुळ निवडणुकीवरून कोल्हापुरात महायुतीमध्ये वादाची ठिणगी सुरुच आहे. भाजप पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या आरोपांमुळे मुश्रीफ समर्थक देखील आक्रमक पवित्र्यात आहेत.
अन्य कोणी छुपे मित्रपक्ष आहेत का?
नाथाजी पाटील यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजप, शिवसेना, जनसुराज्य सोडून अन्य कोणी छुपे मित्रपक्ष आहेत का हे पहिल्यांदा त्यांनी जाहीर करावे आणि मग संयुक्त पॅनेलची मागणी करावी. चंद्रकांत दादा पाटील वरिष्ठ नेतृत्वाशी किंवा स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून दोन्ही पक्षातील बेबनाव दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु काल गोकुळचे संचालक युवराज पाटील आणि केडीसीसीचे संचालक भैय्या माने यांनी अशी मागणी केली आहे. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, ही मागणी ते कशासाठी करत आहेत?राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मित्रपक्ष हे शिवसेना, भाजप, जनसुराज्य वगळून अन्य कोणी आहेत का? या प्रश्नाचे उत्तर खरंतर त्यांनी द्यायला हवं. गोकुळच्या निवडणुकीच्या बाबतीत मी माझ्या मंजुनाथ सहकारी दूध व्यवसायिक संस्थेच्या वतीनं कोल्हापूरच्या सर्किट बेंच मध्ये एक याचिका दाखल केलेली आहे की गेल्या 110 दूध संस्था ज्या अवसायनामध्ये निघण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, या 1108 दूध संस्थांना मताचा अधिकार प्राप्त व्हावा.
या लोकांना निवडणुकीची घाई का लागली?
या 1108 दूध संस्था ज्यावेळी मतामध्ये येतील त्यावेळी निश्चित खऱ्या अर्थानं या सभासदांना न्याय मिळेल. परंतु या मतांमध्ये येण्याच्या पूर्वीच या लोकांना निवडणुकीची घाई का लागली? असा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडतो. त्यामुळं माझी भैय्या माने साहेबांना आणि युवराज बापूंना विनंती आहे की त्यांनी अशा चुकीच्या पद्धतीच्या बातम्या प्रसारित करून महायुतीमध्ये पुन्हा बेबनाव वाढेल अशा पद्धतीची वक्तव्य करू नये.
काय म्हणाले होते भैय्या माने?
भैय्या माने यांनी म्हटलं आहे की, गोकुळची निवडणूक महायुतीमार्फत लढवायची असे आमचे नेते मुश्रीफ साहेबांनी वारंवार सांगितलं आहे. मात्र, महायुतीत एक घटक आणि त्यांचे आमदार हे थेट मुश्रीफ साहेबांवर टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं एक भाऊ म्हणून महायुतीमध्ये राजधर्म स्वीकारला आहे. अशावेळी गोकुळबद्दल बेछूट आरोप करणं आणि बँकेबद्दल काहीतरी बोलणं हे थोडंसं दुःखद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला वगळून पॅनेल करा म्हणत असाल तर आमची अशी भूमिका आहे की फडणवीस साहेब यांना विश्वासात घेऊन मुश्रीफ साहेबांनी भेटावं.
कारण काढून काहीतरी बेछूट आरोप करतात. कोणतेही पुरावे देत नाहीत, अशावेळी या गोष्टी क्लेशदायक आहेत. त्यामुळे आमची भूमिका रास्त आहे. आजऱ्याचा कोणीतरी कार्यकर्ता, किती बेछूट आरोप करतात, चुकीचे आरोप करतात, नियमबाह्य करतात, कायदा त्यांना माहीत नाही त्यामुळे असे आरोप सुद्धा आम्ही खपवून घेणार नाही. त्यामागे कोण जर अदृश्य शक्ती असतील त्यांनी सुद्धा थांबवावं असे आवाहन करतो, असे ते म्हणाले. आम्ही महापालिकेला, जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला, नगरपालिकेला सगळ्यांना या अग्निपरीक्षेतनं आम्ही गेलो आहे. अशावेळी भाजपचे अध्यक्ष अशा पद्धतीनं बोलत असतील तर ते खेदजनक असल्याचे ते म्हणाले.











