सांगोला (प्रतिनिधी) : सन २०२६ च्या रब्बी हंगामात सांगोला तालुक्यातील आंबा व शेवगा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी किरण वाघमोडे यांनी केली आहे.
यंदा तालुक्यात आंबा पिकाला विक्रमी मोहोर आला होता. मात्र बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसला असून धुके, वाढलेली उष्णता आणि वातावरणातील अनियमित बदलांमुळे आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणात गळून पडला. त्याचबरोबर झाडांवर राहिलेल्या आंब्यालाही तीव्र उष्णतेमुळे गळती लागून उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

दुसरीकडे, सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या शेवगा पिकालाही यंदा फटका बसला आहे. शेवग्याची फुले करपून गेल्यामुळे उत्पादन पूर्णपणे घटले असून अनेक ठिकाणी हे पीक फेल झाले आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी किरण वाघमोडे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, तालुका कृषी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून शासनाने लवकरात लवकर मदत करावी, अशी विनंती केली आहे.









