WTC Points Table India vs England 2nd Test: भारताने तब्बल 58 वर्षांनंतर एजबेस्टन मैदानावर इंग्लंडचा पराभव केला. या विजयासह भारताने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयाचं खातं उघडलं आहे.
India vs England 2nd Test: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने (England vs India, 2nd Test) तब्बल 336 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलची (Shubhman Gill) सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. शुभमन गिलने पहिल्या डावात 269 धावा आणि दुसऱ्या डावात 161 धावा केल्या.
भारतीय क्रिकेट संघाने तब्बल 58 वर्षांनंतर एजबेस्टन मैदानावर इंग्लंडचा पराभव केला. या विजयासह भारताने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2025-26) मध्ये विजयाचं खातं उघडलं आहे. भारत WTC च्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. दोन सामन्यांमधील पहिल्या विजयासह, भारताच्या खात्यात 12 गुण झाले आहेत आणि गुणांची टक्केवारी 50 आहे. त्याचवेळी इंग्लंड 12 गुण आणि 50 गुणांच्या टक्केवारीसह पाचव्या स्थानावर घसरला आहे. सध्या, ऑस्ट्रेलिया 12 गुण आणि 100 गुणांच्या टक्केवारीसह अव्वल स्थानावर आहे तर श्रीलंका आणि बांगलादेश अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
सामन्यातील पहिला डाव कसा राहिला?
दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स यानं टॉस जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजीला बोलावण्याचा निर्णय घेतला. भारताच्या फलंदाजांनी पहिल्या कसोटीत झालेल्या चुकांमध्ये सुधारणा करत दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 587 धावा केल्या. यशस्वी जयस्वालनं 87 धावांची खेळी करत चांगली सुरुवात केली. यानंतर करुण नायर, केएल राहुल मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. याचवेळी कॅप्टन शुभमन गिल यानं रवींद्र जडेजा सोबत 203 धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजानं 89 धावांची खेळी केली. शुभमन गिलनं 269 धावांची खेळी केली. भारत या जोरावर 587 धावांपर्यंत पोहोचला. भारतानं मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला पहिल्या डावात 407 धावांवर रोखलं. सिराजनं 6 विकेट घेतल्या तर आकाश दीपनं 4 विकेट घेतल्या. हॅरी ब्रुकनं 158 धावा केल्या तर जेमी स्मिथ 184 धावा करुन नाबाद राहिला. भारताच्या दोन्ही गोलंदाजांनी इंग्लंडच्या 6 फलंदाजांना खातं देखील उघडू दिलं नाही. यामुळं इंग्लंडचा संघ 407 धावांवर बाद झाला आणि भारताला 180 धावांची आघाडी मिळाली.
सामन्यातील दुसरा डाव कसा राहिला?
भारतानं दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या 161 धावा आणि केएल राहुल, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 427 धावांवर डाव जाहीर केला. शुभमन गिलनं पहिल्या डावात 269 धावा केल्या तर दुसऱ्या डावात शतक केलं. पहिल्या कसोटीत भारताची मिडल ऑर्डर आणि लोअर ऑर्डर अपयशी ठरली होती. त्यांनी दोन्ही डावात कामगिरी सुधारली. भारतानं 6 बाद 427 धावांवर संघ जाहीर केला. यामुळं इंग्लंडपुढं विजयासाठी 608 धावांचं लक्ष्य होतं. इंग्लंडला भारतानं दुसऱ्या डावात जोरदार धक्के दिले. आकाश दीपनं इंग्लंडचे ओली पोप, जो रुट, हॅरी ब्रुक, बेन डकेट यांना बाद केलं. मोहम्मद सिराजनं क्रॉलीला बाद केल. तर, वॉशिंग्टन सुंदरनं बेन स्टोक्सला बाद केलं. यामुळं भारताची वाटचाल विजयाच्या दिशेनं झाली. जेमी स्मिथनं 88 धावा केल्या तर इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.