लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी; अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पडताळणी, घरात ‘ती’ दिसली तर थेट लाभ होणार रद्द

पुणे: राज्यातील लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) महिला लाभार्थी सुमारे अडीच कोटींपर्यंत पोहचल्या असून, यामध्ये निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महिला व बालकल्याण विभागाने निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. योजनेचे खरे लाभार्थ्यांना लाभ मिळावा आणि सरकारने निवडणुकीत दिलेल्या 2100 रुपयांच्या आश्वासनाची अंमलबजावणी करताना तिजोरीवर अधिक बोजा न येईल, यासाठी सरकारने खबरदारी घेण्याची चर्चा विभागात सुरू आहे.
आता यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी असेल तर आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे, कारण आजपासून(मंगळवारपासून ता. 4) घरोघरी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहे. चारचाकी वाहन तुमच्या कुटुंबीयांच्या नावावर असल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले, तर तुम्हाला थेट अपात्र करण्यात येणार आहे.
घरी जाऊन चारचाकी वाहनाची पडताळणीचे आदेश
पुण्यामधील 21 लाख 11 हजार 991 बहिणींनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता. त्या सर्व महिलांच्या घरी चारचाकी आहे, का याची पडताळणी केली जाणार आहे, त्यानंतर चारचाकी असलेल्या बहिणी अपात्र ठरणार आहेत. महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी काल (सोमवारी ता. 3) ऑनलाईन बैठक घेत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना ‘लाडक्या बहिणींच्या’ घरी जाऊन चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन ती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेचे काय आहेत निकष?
लाभार्थी महिलेचे वय १८ ते ६५ च्या दरम्यान असावे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावे.
कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा, तसेच प्राप्तिकर भरणारा नसावा.
संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
चारचाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील.
विभक्त लाडक्या बहिणींना राहणार लाभ
मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सासरे, दीर अथवा घरातील इतरांच्या नावावर चारचाकी असेल आणि लाभार्थी महिला पती, मुलांसोबत विभक्त (वेगळी) राहत असेल, तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहणार आहे.
अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार
लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना स्वतःहून लाभ घेण्यापासून माघार घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र, यानंतरही लाभार्थी महिलांच्याकडून माघार घेण्यात येत नसल्यामुळे शासनाच्या निदर्शनास आल्यास, अशा लाडक्या बहिणींवर प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासंबधीचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.